हवाई संरक्षण यंत्रणा भारताला समजू नये म्हणून ड्रोन रोखले नाहीत   

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे हास्यास्पद विधान 

इस्लामाबाद : भारताचे ड्रोन रोखण्याची आमची क्षमता असतानाही आम्ही ते रोखले नाहीत, असे हास्यास्पद वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या संसदेत केले. या वक्तव्यामुळे आसिफ यांची चांगलीच फजिती झाली. 
 
आसिफ म्हणाले, पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सची ठिकाणे शोधण्यासाठी भारताकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. ही एक तांत्रिक बाब आहे, जी मी स्पष्टपणे सांगू शकत नाही. हवाई संरक्षण युनिट्सची ठिकाणे उघड होऊ नये, म्हणून पाकिस्तानने भारताचे ड्रोन पाडले नाहीत, असे ते म्हणाले. 
 
दोन दिवसांपूर्वीच आसिफ यांनी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विश्वासार्ह पुरावेही नसल्याचे सांगत त्याबाबत प्रश्न उपस्थित करत हा दावा खोडून काढला. त्यावर भारतानेही पुरावे मागितले. त्यावर आसिफ यांनी ही माहिती भारतीय समाजमाध्यमावर आल्याचे सांगितले. एका संरक्षणमंत्र्याने समाजमाध्यमावर विश्वास ठेवला म्हणून, त्यांची जगभरात खिल्ली उडवली जात आहे. 
 
दरम्यान, भारताने गुरूवारी पाकिस्तानच्या अनेक शहरांमधील हवाई संरक्षण युनिट्सवर हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये लाहोरमधील एक हवाई संरक्षण युनिटही उद्ध्वस्त झाले. याआधी  पाकिस्तानने बुधवारी रात्रीपासून भारताचे २५ ड्रोन पाडल्याचा दावा केला होता. 
 

Related Articles